Go to full page →

अध्याय ४०—समुद्रावरील रात्र DAMar 323

मत्तय १४:२२-३३; मार्क ६:४५-५२; योहान ६:१४-२१.

वसंत ऋतूतील सायंकाळच्या संधिप्रकाशात गवताळ मैदानावर बसून ख्रिस्ताने पुरविलेले जेवण लोक खात होते. त्या दिवसाचे वचन देवाची वाणी असे त्यांच्या कानी पडले. अशा प्रकारे आजाऱ्यांना बरे करणे ही केवळ देवाच्या सामर्थ्याचीच कृती आहे अशी त्यांची साक्ष होती. परंतु मोठ्या समुदायातील प्रत्येकाला भाकरीचे भोजन अति आकर्षण वाटले. त्याचा फायदा सर्वांना झाला. मोशेच्या काळात अरण्यामध्ये देवाने इस्राएल लोकांना खाण्यास मान्ना दिला होता; त्या दिवशी त्यांना कोणी खायला दिले होते? मोशेने त्याच्याविषयी अगोदरच सांगून ठेविले होते. जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासळी यांच्याद्वारे हजारो जणांची भूक भागविणे कोणत्याही मानवी शक्तीने ते शक्य झाले नसते. ते परस्परात बोलू लागले की, “संदेष्टा जगात येईल हे सत्य आहे.’ DAMar 323.1

दिवसभरात त्यांची खात्री दृढ झाली. फार दिवसापासून अपेक्षित उद्धारक त्यांच्यामध्ये होता ही अति महत्त्वाची बाब होती. लोकांच्या आशा दुणावत होत्या. तो यहूदा प्रांत दुधामधानी भरलेले जगातील नंदनवन बनवील. प्रत्येकांची आशा तो पूर्ण करील. रोमी सत्ता तो मोडून टाकील. यहूदा आणि यरुशलेम यांची तो मुक्तता करील. लढाईमध्ये जखमी झालेल्या सैनिकांना तो बरे करील. सबंध आरमाराला तो अन्न पुरवील. इतर राष्ट्रांना पादाक्रांत करून तो फार दिवसापासून अपेक्षित असलेले राज्यपद इस्राएलाला देईल. DAMar 323.2

त्यांच्या त्या उत्साहात त्याला आकस्मात राजा बनविण्यास लोक सज्ज होते. लोकांचे लक्ष व सन्मान स्वतःकडे वेधून घेण्याचा तो प्रयत्न करीत नाही याविषयी ते जागृत होते. ह्या बाबतीत तो याजक व अधिकारी यांच्याहून वेगळा होता आणि दाविदाच्या सिंहासनावर बसण्यास केव्हाही तो आग्रही राहाणार नाही असे त्यांना वाटत होते. आपापसात सल्लामसलत करून त्याला बळजबरीने धरून इस्राएलाचा राजा घोषीत करण्याचे ठरविले. त्यांच्या प्रभूने दाविदाच्या सिंहासनावर बसणे हा त्याचा वारसा हक्क आहे असे समजून त्याचे शिष्यही जमावात सामील झाले. असा सन्मान नाकारणे हा ख्रिस्ताचा शिष्टाचार आहे असे त्यांना वाटले. लोकांनी आपल्या उध्दारकाला मोठ्या पदास चढवावे. देवाच्या सामर्थ्याने येणाऱ्याचा सन्मान करण्यास याजक आणि अधिकारी यांना भाग पाडले पाहिजे. DAMar 323.3

त्यांचा उद्देश साध्य करून घेण्यास ते फार आतुर आणि निश्चयी होते; परंतु काय चालले आहे आणि त्याचा परिणाम काय होईल हे येशूने ओळखले कारण त्यावेळीसुद्धा याजक व अधिकारी त्याचा जीव घेण्याच्या विचारात होते. लोकांना त्यांच्यापासून दुरावण्याचा तो प्रयत्न करीत आहे असा आरोप ते करीत होते. सिंहासनावर त्याला बसविले तर हिंसक कृती व बंड, उठाव होण्याची धास्ती होती आणि त्यामुळे आध्यात्मिक राज्याच्या कार्यात अडथळे उद्भवतील. विनाविलंब ही मोहीम अटोक्यात ठेवली पाहिजे. त्याने शिष्यांना बोलाविले आणि ताबडतोब कफर्णहूमला जाण्यास सांगितले आणि लोकांना विसर्जित करण्यासाठी तो थांबला. DAMar 324.1

त्याचा हा आदेश पाळणे त्यांच्या फार जीवावर आले. येशला राजासनावर बसविण्याची लोकमान्य मोहीमेची ते फार दिवसापासून अपेक्षा करीत होते. परंतु हे सगळे निष्फळ होऊन जावे हा विचारच त्यांना असह्य झाला. वल्हांडण सण पाळण्यासाठी आलेला मोठा लोकसमुदाय नवीन संदेष्ट्याला पाहाण्यास अति उत्सुक होता. इस्राएलाच्या राज्यासनावर त्यांच्या प्रभूला विराजमान करण्याची ही सुवर्ण संधि आहे असे त्याच्या अनुयायांना वाटत होते. ह्या नवीन महत्कांक्षेने उल्हासित झालेल्या शिष्यांना त्या निर्जन ओसाड किनाऱ्यावर येशूला एकटेच सोडून देऊन जाण्यास फार कठीण झाले होते. त्यांनी ह्या व्यवस्थेला विरोध केला; परंतु येशूने त्यांना ह्यावेळेस अपूर्व अधिकाराने सांगितले. त्यावर त्यांनी अधिक नकारात्मक भूमिका न घेता मुकाट्याने समुद्राकडे जाण्याचा मार्ग धरिला. DAMar 324.2

त्यानंतर त्याने लोकांना निघून जाण्यास सांगितले; आणि ज्या प्रकारे त्याने सांगितले ते मोडण्यास त्यातील कोणीही धजले नाही. स्तुतीपर आणि गोरवी शब्द त्यांच्या मुखावरच राहिले. त्याला पुढे जाण्यास त्यांनी त्याला अटकाव केला नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहाची व आनंदाची छटा निस्तेज झाली, मावळून गेली. त्या लोकसमुदायात काही लोक अत्यंत विचारवंत व करारी निर्धाराचे होते; परंतु राजाला शोभणारी येशूची वागणूक आणि अधिकार वाणीने काढिलेल्या उद्गाराने त्यांची हुल्लडबाजी चिरडून गेली आणि त्यांची योजना निष्फळ ठरली. जगातील सर्व अधिकारामध्ये त्याची सत्ता सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य करून विना हरकत ते त्याला वश होतात. DAMar 324.3

मग एकटा राहिल्यावर “तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला.” तेथे चार तास देवाजवळ विनंती करीत होता. स्वतःसाठी नाही परंतु जे प्रार्थना करीत होते त्यांच्यासाठी. सैतान त्यांना अंध करून त्यांची विवेकबुद्धी विपर्यस्त करू नये म्हणून त्याच्या कार्याच्या दिव्य स्वरूपाचे आकलन होण्यासाठी त्यांना सामर्थ्य प्राप्त होण्यास त्याने प्रार्थना केली. ह्या पृथ्वीवरील त्याच्या सेवेचे कार्य जवळ जवळ संपुष्टात आले होते आणि थोडेजन त्याचा उद्धारक म्हणून स्वीकार करतील हे येशूला माहीत होते. कष्टाने आणि विरोधाला तोंड देत त्याने शिष्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्यांची कडकरित्या परीक्षा होईल. लोकप्रिय चुकीच्या समजुतीवर आधारभूत असलेल्या, मनात जतन करून ठेवलेल्या आशांची दारूण व मानहानीची निराशा होईल. दाविदाच्या सिंहासनावर विराजमान होण्याच्या ऐवजी त्याच्या वधस्तंभाचे दृश्य त्यांना दिसेल. खरे पाहिले तर हा त्याचा राजाभिषेक होता. परंतु त्याचे त्यांना आकलन झाले नाही आणि त्यामुळे मोहांनी त्यांना पछाडले आणि ते मोह आहेत असे समजणे त्यांना कठीण झाले. पवित्र आत्म्याने त्यांची मने प्रकाशीत करून त्यांची आकलन शक्ती प्रगल्भ केल्याशिवाय शिष्यांची श्रद्धा निकामी झाली असती. त्याच्या राज्याविषयीची कल्पना जगातील सन्मान व भरभराट यांच्याशी मर्यादित झालेली पाहून येशूला दुःख होत होते. त्याबद्दल त्याच्या मनावर फार मोठे ओझे, ताण होता आणि ही नम्र विनंती त्याने प्राणांतिक दुःखाने अश्रू ढाळीत व्यक्त केली. DAMar 324.4

येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी ताबडतोब प्रवासास सुरूवात केली नाही. ते त्याची वाट पाहात थोडा वेळ तेथेच जमीनीवर राहिले. परंतु अंधार पडू लागल्यावर, “ते मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले.” येशूला सोडल्यापासून त्यांची अंतःकरणे असंतुष्ट होती आणि प्रभु म्हणून त्याचा स्वीकार केल्यापासून ह्या वेळेस ते अधिक अधिर, असहिष्णु झाले होते. त्याला राजा म्हणून घोषीत करू दिले नाही म्हणून ते कुरकुर करीत होते. सहजरित्या त्याच्या आदेशाचे पालन केल्याबद्दल ते स्वतःला दोष देऊ लागले. त्यांच्या म्हणण्यात चिकाटी दाखविली असती तर त्यांचा उद्देश साध्य झाला असता असे त्यांना वाटले. DAMar 325.1

त्यांच्या मनावर आणि अंतःकरणावर अश्रद्धेची पक्कड बळकट होत होती. मानसन्मान यांच्या ध्यासाने ते अंधळे झाले होते. परूशी त्याचा द्वेष करितात हे त्यांना माहीत होते म्हणून त्याला उच्च पदावर पाहण्यासाठी ते अति उत्सुक होते. अद्भुत चमत्कार करणारा, तथापि फसवेगिरीच्या आरोपाने निर्भर्त्सना केलेल्या शिक्षकाबरोबर सयुक्त होणे म्हणजे सहन करण्यास कष्टाचे असलेल्या कसोटीस तोंड देणे होय. खोट्या संदेष्ट्याचे ते अनुयायी आहेत असे ते नेहमीच म्हणतील काय? ख्रिस्त राजा म्हणून आपली सत्ता केव्हाही प्रतिपादन करणार नाही काय? इतका शक्तिमान असताना त्याने आपला खरा स्वभाव का प्रगट करू नये आणि त्यांचा मार्ग कमी दुःखदायक का करू नये? भीषण मरणापासून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्याने का वाचविले नाही? अशा प्रकारच्या विचारसरणीने शिष्यांनी स्वतःला आध्यात्मिकरित्या अंधकारात लोटून घेतले. त्यांनी विचारिले, परूश्यांच्या प्रतिपादनाप्रमाणे येशू तोतया किंवा भोंदू तर नाही ना? DAMar 325.2

त्या दिवशी शिष्यांनी ख्रिस्ताची सत्कृत्ये पाहिली. जणू काय पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे असे वाटले. त्या मोल्यवान वैभवी दिवसाच्या स्मरणाने त्यांची अंतःकरणे श्रद्धा व आशा यांनी भरायला पाहिजे होती. ह्या गोष्टीविषयी त्यांनी मनापासून विचार- विनिमय केला असता तर ते मोहात पडले नसते. परंतु त्यांचे सगळे विचार त्यांच्या निराशाने आत्मसात केले होते. “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा,’ हे ख्रिस्ताचे बोल त्यांनी ऐकिले नव्हते. त्या समयी शिष्यांच्यावर मोठा कृपा- प्रसाद झाला होता त्याचा त्यांना विसर पडला होता. ते फार अडचणीत पडले होते. त्यांचे विचार अवास्तव, वादळी व कडाक्याचे होते आणि त्याच वेळी त्यांच्या मनाला दुःख होणाऱ्या गोष्टीमध्ये ते गुंग होऊन जातील असे दुसरेच प्रभूने त्याना दिले होते. जेव्हा मनुष्य स्वतः मनस्ताप करून जीवित असह्य करून टाकितो तेव्हा देव वारंवार असे करितो. शिष्यांना मनस्ताप करून घेण्याची काही आवश्यकता नव्हती. केव्हाच धोक्याचे आगमन झपाट्याने होत होते. DAMar 326.1

झंझावती वादळ त्यांच्यावर न कळत येत होते आणि त्याला तोंड देण्यासाठी त्यांची तयारी नव्हती. हा आकस्मात परस्परविरोध होता. कारण दिवस तर अगदी उत्कृष्ट होता; परंतु वादळाचा त्यांना तडाखा बसला तेव्हा ते घाबरून गेले. असहिष्णुता, अश्रद्धा आणि असंतुष्टता ते विसरून गेले. प्रत्येकजण मचवा वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होता. बेथसैदापासून येशूला भेटण्याचे ठिकाण फार दूर नव्हते आणि स्वच्छ वातावरणात ते अंतर तोडण्यास काही तास लागत होते; परंतु तोंडच्या वाऱ्याने ते इच्छित ठिकाणापासून दूर लोटले गेले. रात्रीच्या चवथ्या प्रहरापर्यंत तारू वल्हवून ते हैराण झाले होते. शेवटी थकलेल्या त्या माणसांनी आशा सोडली. वादळात आणि अंधारात समुद्राने त्यांना त्यांच्या स्वतःच्या असत्ययतेचा व लाचारपणाचा धडा शिकविला, आणि त्यांनी त्याच्या प्रभूच्या उपस्थितीची उत्सुकतेने अपेक्षा केली. DAMar 326.2

येशूला त्यांचा विसर पडला नव्हता. त्या झंझावाती वादळाशी भयभीत झालेली माणसे झगडत असल्याचे किनाऱ्यावरील पहारेकऱ्याने पाहिले. क्षणभरसुद्धा ते त्याच्या नजरेआड झाले नव्हते. घोर उत्कंठतेने तुफानी वाऱ्यात हेलकावे खाणारे तारू त्याने पाहिले; कारण ही माणसे जगाचा प्रकाश होणार होती. जशी माता जागरूक राहून आपल्या बाळाची काळजी वाहाते तसेच दयाळू प्रभु आपल्या शिष्यांची काळजी घेतो. जेव्हा त्यांची अंतःकरणे नम्र झाली, त्यांच्या अपवित्र महत्वाकांक्षा चिरडून गेल्या, आणि विनयशीलतेने मदतीसाठी याचना केली तेव्हा ती मान्य करण्यात आली, मदत देण्यात आली. DAMar 326.3

त्या सर्वांचा नाश होणार ह्या विचारात असताना प्रकाशाच्या झोतात एक दुर्बोध व्यक्ती पाण्यावरून त्यांच्याकडे येताना दिसली. तो येशू आहे हे त्यांना माहीत नव्हते. त्यांना मदत करण्यासाठी आलेल्याला त्यांनी त्यांचा शत्रू समजले. भीतीने ते गांगरून गेले. बळकट स्नायूच्या हातातील वल्ही निसटून पडली. वाऱ्याच्या जोरावर तारू हेलकावे खात होता. समुद्राच्या मोठ्या लाटावरून येणाऱ्या मनुष्यावर सर्वांची नेत्रे खिळली होती. DAMar 326.4

त्यांचा नाश करण्याचे ते शुभाशुभ भूत समजून ते भीतीने ओरडू लागले. त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा येशूचा बेत होता; परंतु त्यांनी त्याला ओळखिले आणि मदतीसाठी विनवणी केली. प्रेमळ प्रभु त्यांच्याकडे वळला आणि त्याची वाणी ऐकून त्यांचे भय नाहीसे झाले. त्याने म्हटले, “धीर धरा. मी आहे: भिऊ नका.” DAMar 327.1

आश्चर्यकारक घटनेतील वस्तुस्थिती समजल्याबरोबर विनाविलंब पेत्र हर्षभरीत झाला. त्याने म्हटले, “प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये.” DAMar 327.2

ख्रिस्तावर आपली नजर केंद्रित करून पेत्र पाण्यावरून चालतो; परंतु त्यामध्ये समाधानी वृत्ती बाळगून तारवातील आपल्या सोबत्याकडे नजर फेकतो आणि उद्धारकावर खिळलेली त्याची दृष्टी दुसरीकडे फिरवितो. वारा सोसाट्याचा होता. प्रभु आणि त्याच्यामध्ये मोठमोठ्या उंच लाटा येत होत्या; त्यामुळे त्याची गाळण उडाली. क्षणासाठी ख्रिस्त त्याच्या दृष्टीआड झाला आणि त्याचा विश्वास ढळला. तो बुडायला लागला. मोठमोठ्या लाटामुळे मृत्यू सामोरे दिसत असताना पेत्राने आपली दृष्टी खवळलेल्या लाटावरून काढून ख्रिस्तावर खिळली आणि ओरडून म्हणाला, “प्रभूजी मला वाचवा.’ येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास?” DAMar 327.3

पेत्राने आपला हात प्रभूच्या हातात देऊन ते दोघेजण बरोबर चालून तारवात चढले. पेत्र आता शांत व नम्र होता. आता सोबत्यापुढे स्वतःची फुशारकी मारू शकत नव्हता, कारण अविश्वास व आत्मस्तुती, प्रतिष्ठा ह्यामुळे त्याने जवळ जवळ आपला जीव गमावला होता. जेव्हा त्याने येशूवरील आपली दृष्टी बाजूला केली तेव्हा त्याच्या पायाखालील आधार डळमळला आणि प्रचंड लाटामध्ये तो बुडू लागला. DAMar 327.4

संकट समयी पेत्राप्रमाणेच अनेक वेळा आमची गत होते! उद्धारकावर दृष्टी रोखण्याच्याऐवजी भल्या प्रचंड लाटाकडे पाहात राहातो. आमच्या पायाखालील आधार ढासळतो आणि अहंमपणाच्या जलाखाली चिरडले जातो. नाश होण्यासाठी येशूने पेत्राला आपल्याकडे येण्यास सांगितले नव्हते. आम्ही त्याचा त्याग करून जाण्यासाठी तो आम्हाला माझ्यामागे या असे म्हणत नाही. तो म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडविले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे; तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बडवावयाच्या नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजावयाचा नाहीस; ज्वाला तुला पोळावयाची नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभु तुझा त्राता आहे.” यशया ४३:१-३. DAMar 327.5

येशूने आपल्या शिष्यांची मने ओळखली. त्यांच्या विश्वासाची सत्वपरीक्षा कशी तीव्र होणार हे त्याला माहीत होते. ह्या समुद्रावरील अनुभवाद्वारे पेत्राला स्वतःमधली निर्बलता दाखवून दिव्य शक्तीवर अविरत अवलंबून राहण्यात सुरक्षितता आहे हे त्याला दाखवायचे होते. मोहांच्या पिसाट वादळात, स्वतःवरील अविश्वास आणि उद्धारकावरील दृढ विश्वास ह्यामुळेच आम्ही सुरक्षित चालू शकतो. पेत्र जेव्हा स्वतःला बलवान समजत होता त्याच वेळी तो दुर्बल, बलहीन होता; आणि स्वतःची दुर्बलता लक्षात येईपर्यंत तो ख्रिस्तावर अवलंबून राहाण्याची गरज त्याला भासली नाही. समुद्रावरील अनुभवाद्वारे येशूला जो धडा त्याला शिकवायचा होता तो त्याने शिकला असता तर मोठी कसोटी आल्यावर पेत्र त्यामध्ये अपयशी झाला नसता. DAMar 328.1

हरदिनी देव आपल्या लोकांना प्रबोधन करितो. जीवनातील प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीने. पुढे ठरलेल्या घटनेच्या वेळी तोंड देण्यास तो त्यांना सज्ज करितो. प्रत्येक दिवसाच्या कसोटीवर आगामी महान संकटसमयीचे त्यांचे यशापयश अवलंबून आहे. DAMar 328.2

देवावर सतत अवलंबून राहाण्याचे जे लक्षात घेत नाहीत किंवा त्याचा अनुभव घेत नाहीत त्यांच्यावर मोहपाशाचे वर्चस्व राहील. आता आम्ही गृहीत धरू की आमचे पाय सुरक्षित आहेत आणि आम्ही केव्हाही ढळणार नाही. आम्ही विश्वासाने ठामपणे म्हणू की, मी कोणावर विश्वास ठेवितो हे मला माहीत आहे; देव व त्याच्या वचनावरील माझा दृढ विश्वास कशानेही डळमळणार नाही. परंतु सैतान आमच्या स्वभावातील आनुवशिंक आणि संपादित विशेष गुण किंवा लक्षणे यांचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करून आमच्या गरजा व उणीवा, दोष ह्यांच्या बाबतीत आम्हाला तो अंधळे करीत आहे. केवळ आमच्या दुर्बलतेची जाणीव ठेऊन आणि खंबीरपणे ख्रिस्तावर नजर रोखून पाहिल्याने आम्ही सुरक्षित मार्गक्रमण करू शकतो. DAMar 328.3

येशू मचव्यात चढल्याबरोबर वारा पडला, “आणि त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यास लागला.’ धडकी भरणारी रात्र संपली आणि प्रभातेचा प्रकाश उदय पावला. शिष्य आणि इतर जे तारवात होते त्यांनी येशूच्या पाया पडून कृतज्ञतेने उद्गार काढिले, “खरोखर, आपण देवाचे पुत्र आहा!” DAMar 328.4