Go to full page →

अध्याय १६ वा—“हरवला आणि तो सापडला आहे” COLMar 140

लूक १५:११-३२

“आणखी तो म्हणाला,“कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते, त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडविली. त्याने आपले सर्व खर्चुन टाकील्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाश्याजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला; त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातल्या तरी खावून पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. नंतर तो शुध्दीवर येवून म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे! आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरूध्द व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे; आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही; आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यात त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि कळवळा येवून तो धावत गेला, त्याने त्याच्या गळयात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरूध्द व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे, आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही; पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला; आणि याच्या हातात आगठी व पायात जोडा घाला, पोसलेले वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि उत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन: जीवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे, मग ते उत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने वाद्ये व नृत्य ऐकले. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे ? त्याने त्याला सांगितले, आपला भाऊ आला आहे, आणि तो आपल्या वडीलांना सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पोसलेले वासरू कापिले आहे. तेव्हा तो रागावून आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर येवून त्याची समजूत घालू लागला; परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधी मोडीली नाही; तरी मी आपल्या मित्राबरोबर उत्सव करावा, म्हणून तुम्ही मला कधी करडुही दिले नाही; पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणीबरोबर खाऊन टाकिली तो हा तुमचा मुलगा आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पोसलेले वासरू कापिले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे; तरी उत्सव व आनंद करणे हे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. “लूक १५: ११-३२. COLMar 140.1

हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणी व उधळया पुत्र या दाखल्यातून, परमेश्वरापासून जे बहकलेले आहेत अशा लोकांबाबत परमेश्वराची प्रिती ही स्पष्ट दिसतात. जरी ते लोक परमेश्वरापासून बहकून गेले आहेत तरी परमेश्वर त्याना त्याच्या दुरावस्थेत राहू देत नाही. जो धूर्त सैतान शत्रु त्याच्या मोहात परमेश्वर त्यांना तसेच पडून देत नाही तर त्यांच्यावर त्याची दया व कोमल प्रिती ही दर्शवितो. COLMar 141.1

उधळया पत्राच्या दाखल्यामध्ये जे कोणी प्रभुच्या व पित्याच्या सान्निध्यात राहात होते पण निष्काळजीपणामुळे सैतानाच्या मोहाला ते बळी पडले व त्याचे गुलाम झाले याबद्दल सांगितले आहे. COLMar 141.2

“कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूर देशी गेला.” COLMar 141.3

वडीलांच्या घरातील नियंत्रणाचा, धाकटया मुलास कंटाळा आला. त्या मुलास वाटले की यामुळे त्याला स्वतंत्र जीवन जगता येत नाही, पित्याची प्रिती व काळजी घेणे बाबत त्याचा गैरसमज झाला व त्याने ठरविले की आपल्या मनाप्रमाणे करावयाचे. COLMar 141.4

त्या तरूणाने त्याच्या वयोवृध्द पित्याशी कसे वागावे हे तो विसरला आणि पित्याचे उपकार मनात न आणता एकाद्या लहान मुलाप्रमाणे पित्याकडे त्याने संपत्तीचा वाटा मागितला. जो वाटा, पित्याच्या मृत्यूनंतर घ्यावयाचा असतो तो वाटा, तो मुलगा आताच मागू लागला. सध्या त्याला चैन करावयास हवी भविष्य काळाचा त्याला विचार नव्हता. COLMar 141.5

धाकटा मुलगा त्याचा वाटा घेवून पित्याच्या घरापासून दूर देशी निघून जातो. स्वत:जवळ असलेले धन विपुल होते व त्याला पाहिजे तसे ते खर्च करणे ही त्याला मोकळीक होती. यामुळे त्याच्या मनाचे सर्व विचार हवेत मनोरे बांधू लागले. अरे मुला तरूणा तू असे करू नकोस त्यामुळे तुझे नुकसान होईल, किंवा अरे तू असे करावे कारण हे योग्य व तुझ्या हिताचे आहे असे सांगावयास तेथे कोणी नव्हते. मित्र मंडळी त्याला रोज पापाच्या खडयांत नेत होते आणि त्याच्या संपत्तीची विल्हेवाट दंगेखोर लोकांच्या संगतीने राहणे यात संपत चालली होती. COLMar 142.1

पवित्र शास्त्रात मनुष्यांचा उल्लेख केला आहे ते म्हणतात, “आपण ज्ञानी आहो असे म्हणवीत असता ते मूर्ख झाले”(रोम १:२२) आणि या दाखल्यातील मनुष्याचा इतिहास असाच आहे. पित्यापासून त्याने संपत्ती स्वार्थीपणाने घेवून वाईट स्त्रियांच्या नादी लागून सर्व संपत्ती उधाळून टाकली. त्या तरूणाची ती संपत्ती व्यर्थ गेली. याशिवाय त्याच्या तारूण्यातील मौल्यवान वर्षे, त्याची बुध्दीमत्ता, तरूणपणातील महत्त्वाकांक्षा, आध्यात्मिक उत्कट इच्छा या सर्वाची त्या लोभ अग्नीत जळून राख झाली. COLMar 142.2

त्या शहरात दुष्काळ पडला आणि त्या तरूणाला अत्यंत अडचण आली व शेवटी तेथील एका नागरीकांची डुकरे चारणे हे काम पत्करले. असले काम करणे म्हणजे यहुदी लोक लजास्पद व कमी दर्जाचे समजत असत. जो तरूण त्याच्या श्रीमतीचा तोरा मिरवीत होता तो आता गुलाम-चाकर बनला. तो आता अक्षरश: गुलामगिरीत सापडला — “तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. (नितीसुत्रे ५:२२) त्याच्या जवळचा पैसा व सोने ही हातात खेळत होती ती आता निघून गेली व तो गुलाम झाला. त्या दुष्काळी देशातील एकांत जागी तो जमिनीवर बसला होता, त्याच्या सभोवार कोणीही मित्र नव्हते तर डुकराचा कळप होता, डुकरे ज्या शेंगा खात होती त्यात एकादी शेंग मिळत असे त्यावर तो पोट भरीत असे. जे मित्र त्याचे पैसे घेवून खाणे व पिणे अशी चैन करीत होते त्यांच्यापैकी एकही मित्र अशावेळी त्याला साहाय्यास नव्हता. आता तो दंगेखोरांचा आनंद कुठे गेला ? सद्विवेक मंदावला, इतर भावनांचे भान हरपले. यात त्याला आनंद वाटत होता, पण आता सर्व पैसा गेला; भूक शमली नाही, गर्व उतरला, नैत्तिक पातळी खाली आली; तो अशक्त व अविश्वासू असा, त्याचे सर्व विचार मृत्त झाले होते, तो अगदी नैत्तिकपणा सोडून फार दुष्ट झाला होता. पापी मनुष्याचे हे किती भयानक चित्र आहे? जरी परमेश्वराच्या आर्शिवादाने वेढा दिला आहे तरी, पापी मनुष्याची प्रवृत्ती स्वभावना व पापी चैनबाजी याकडेच झुकते, इतकी की तो मानव परमेश्वरापासून विभक्त होतो, त्या उधळया पुत्राप्रमाणे परमेश्वर जे चांगले देतो, ते आपले हक्काचे आहे असे समजतो. ते सर्व तो जरूर घेतो. पण त्याच्याबद्दल परमेश्वराचे आभार मानीत नाही; व त्याबाबत प्रितीची सेवाही करीत नाही. ज्याप्रमाणे काईन परमेश्वरापासून निघून जावून त्याचे घर पाहावयास गेला, ज्याप्रमाणे उधळयापुत्र त्याची संपत्ती घेवून ‘दूरदेशी’ निघून गेला, तद्वत् पापी लोक यांना परमेश्वरापासून दूर जाणे यात सुख वाटते. (रोम १:२८). COLMar 142.3

जे जीवन ‘स्व’ केंद्रीत झाले आहे, ते कोणत्याही स्वरूपाचे असो ते उध्वस्त झालेले असते. जो कोणी परमेश्वरापासून विभक्त जीवन जगणेचा प्रयत्न करीतो तो त्याच्या जीवनाची अमोल वर्षे उधळून लावीत असतो, त्यात त्यांच्या मनाचे सामर्थ्य, अंत:करण व आत्मा यांचा समावेश आहे आणि शेवटी त्याची दैन्यावस्था म्हणजे, कायमचा लाचार होतो. जो मनुष्य स्वत:स परमेश्वरापासून विभक्त करीतो तो, धनाचा पुजारी होतो. ज्या मानवाची बुध्दी व कौशल्य देवदूतांच्या सोबतीने राहावे असे परमेश्वराने केले, तो मानव जगिक होतो व शेवटी पशूतुल्य होतो. स्वत:ची सेवा करणे याचा परिणाम अशा प्रकारे होतो. COLMar 143.1

तुम्ही अशा प्रकारे जीवन जगत असाल तर जे अन्न नव्हे अशासाठी तुम्ही पैसे खर्च करीत असाल आणि ज्या कामात समाधान नाही अशासाठी तुम्ही कष्ट करीत असाल, शेवटी अशी वेळ येईल की तुम्हास तुमची बिकट परिस्थिती समजून येईल. अशावेळी एका दूर देशी एकटे व दुरावस्थेत असाल व तुम्ही दु:खाने म्हणाल, “किती मी कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या देहापासून कोण सोडवील?’ (रोम ७:२४) हे विश्व सत्य असून ते संदेष्टयाच्या शब्दांत “जो मनुष्य मनुष्यांवर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही ; अरण्यातील रूक्ष स्थळे, क्षारभूमि व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील‘‘ यिर्मया १७:५,६ “कारण तो (परमेश्वर) वाईटावर व चांगल्यावर व अधार्मिकावरही पाऊस पाडीतो. (मत्तय ५:४९) पण मानवास त्याच्या शक्तिने सुर्यप्रकाश व पाऊस यांच्यापासून स्वत:ला कोंडून घेता येते. धार्मिकतेचा सुर्य (प्रभु) प्रकाश देत असता व कृपेचा सर्वत्र वर्षाव होत असताना आम्ही कदाचित स्वत:हून दुरावून घेतले असावे व “जणू काय अरण्यातील रूक्ष स्थळे, क्षारभूमि व निर्जन प्रदेशात वस्ती करणार‘‘ असे होवू. COLMar 143.2

जो कोणी परमेश्वराच्या प्रितीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतो अशा मनुष्याला परमपित्याच्या घरी परत आणणेसाठी परमेश्वर सर्व काही करीतो. उधळया पुत्र त्याच्या दुर्देवी अवस्थेत असताना तो ‘शुध्दीवर आला’ सैतानाने त्याच्यावर जी फसवेगिरीची सत्ता आणली होती ती मोडून टाकली. उधळया पुत्रास समजून आले की त्याच्या चुकीमुळे त्याच्यावर अशी दुर्धट परिस्थिती आली आणि तो म्हणाला. “माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यांस भाकरीची रेलचेल आहे ! आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन‘‘ उधळया पुत्र दुर्दैवी असा झाला होता, तरी त्याला त्याच्या पित्याच्या प्रितीत आशा आहे याची त्याला खात्री झाली. ती प्रिती त्याला त्याच्या घराकडे ओढून नेत होती. पित्याची प्रिती ही त्या उधळया पुत्राला व पापी लोकांना स्वर्गीय पित्याकडे ओढत असते. “देवाची दया तुला पश्चात्ताप करावयास लावणारी आहे‘. रोम २:४ जो प्रत्येक आत्मा धोक्यात आहे त्याच्या सभोवार दया व कृपायुक्त अशी सोनेरी साखळी आहे. प्रभु त्याला म्हणतो, “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे‘‘ यिर्मया ३१:३ COLMar 144.1

तो उधळया पुत्र मनाचा निश्चय करून पाप कबुली करीतो. तो त्याच्या पित्याकडे जाऊन त्यांना म्हणेल, “बाबा मी स्वर्गाविरूध्द व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे; आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही; पण त्याने पित्याच्या प्रेमाची मर्यादा ओलांडली म्हणून तो म्हणतो, “आता आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा‘. COLMar 144.2

तो तरूण तो डुकरांचा कळप, त्यांचे खाणे तेथेच सोडतो व त्याच्या पित्याच्या घरी जाण्यास निघतो. भुकेने जीव व्याकुळ झालेला, अशक्तपणा आलेला अशा अवस्थेत तो रस्त्याने आतुरतेने चालतो. त्याच्या अंगावरील चिंध्या झाकणेसाठी त्याजकडे कांबळ वा चादर नव्हती. त्याच्या दारिद्रीपणाने त्याचा गर्व हरण झाला होता, तो घरी कधी जाईन व बापाला भेटून चाकराची तरी वागणुक मिळावी अशी विनती करीन असे तो मनात म्हणत असेल. COLMar 144.3

जेव्हा तो अविचारी तरूण त्याच्या ऐषारामाच्या विचाराच्या भरात पित्याचे घर सोडून गेला तेव्हा पित्याला किती दुःखाच्या वेदना व पुत्राची आतुरता याची कल्पना अशा तरूणाला त्यावेळी काय कल्पना येणार ? जेव्हा तो तरूण त्याच्या मित्राबरोबर नृत्य पाहाणे व मेजवानी खाणे यात गुंग झाला होता त्याला त्याच्या घरावर किती दु:खाची गडद छाया पडली होती हे त्याच्या ध्यानीही नसेल. पण आता तोच तरूण थकलेला, कष्टी मनाने घराकडे येत होता, कोणी एकजण त्याची आवडीने वाट पाहत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. पण ‘तो दूर आहे इतक्यांत’ त्याच्या पित्याने त्याला ओळखले. प्रितीची दृष्टी तीक्ष्ण असते. जरी तो पुत्र किती वर्षे पापात गुंतून खालावला होता तरी पित्याने त्याच्या पुत्राला त्वरीत ओळखले, त्याच्या बापाला कळवळा येवून तो धावत गेला; त्याने त्याच्या गळयात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले.” COLMar 144.4

पित्याने त्याच्या पुत्राची ती चिंध्या झालेली वस्त्रे व दुरावस्था याकडे करडी नजर करून पाहून थट्टा केली नाही. पिता स्वत:च्या खांदयावरील उपरणे त्याच्या पत्राला पांघरून चालतो व त्याची मलीन चिंध्या असलेली वस्त्रे झाकतो; ते पाहन पुत्राला हुंदके येतात, तो खूप रडतो व म्हणतो “बाबा, मी स्वर्गाविरूध्द व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही‘‘ पिता त्याला कवटाळून धरून घरी आणतो. तो माझा पत्र आहे आणि त्याला या घरात श्रेष्ठ मान दिला जाईल आणि तेथील चाकर व सेविका त्याची सेवा करतील व त्याला मान देतील. COLMar 145.1

पिता त्याच्या चाकरास म्हणाला, “लवकर उत्तम झगा आणून याला घाला, आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला, पोसलेले वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि उत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन: जिवंत झाला आहे; हरवला होता तो सापडला आहे; मग ते उत्सव करू लागले.” COLMar 145.2

तो उधळयापुत्र अगोदर तारूण्याच्या धुंदीत असताना त्याच्या पित्यास कठोर व कडक वृत्तीचे असे समजत होता. पण आता तो त्याच्या पित्याविषयी वेगळे समजत होता. तद्वत सैतान ज्याना फसवितो ते परमेश्वरास कडक व कठोर असे समजतात. पापी लोकांना मदत करणे याबाबत कायदा हा बंधनकारक आहे असे निमित्त सांगून; पापी लोकांना मदत न करीता केवळ पाहात राहणे व दोष देणे अशी परमेश्वराची भूमिका आहे. परमेश्वराचे नियम हे मानवी सुखाला बंधनकारक आहेत, ते भारी ओझे व जड जू असे आहेत आणि त्यापासून दूर राहाणे हेच चांगले आहे, असे सैतानी दावे आहेत. पण ज्या कोणाची दृष्टी ख्रिस्ताच्या प्रितीने खुली झाली असेल त्यांना परमेश्वर हा संपूर्ण प्रेमळ आहे हे दिसून येईल. परमेश्वर हा छळ करणारा व त्रास देणारा नसून तर त्याच्या पश्चात्तापी पुत्रास स्विकारावयास किती आतुरतेने दाराशी उभा आहे. स्तोत्रसहिता यातील वचनाप्रमाणे तो पापी म्हणेल, “जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो‘‘ स्त्रोतसंहिता १०३:१३. COLMar 145.3

उधळया पुत्राने जे दुर्वतन केले, त्याविषयी थट्टा करणे व त्यावर दोष देणे असे काही नाही. त्या उधळया पुत्राची खात्री झाली की, त्याच्या गत पापांची पापक्षमा झाली, ती सर्व विसरली गेली व सर्वकाळ अशी पुसून टाकली आणि म्हणून परमेश्वर पापीजणास म्हणतो, “तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; मजकडे फीर, कारण मी तुला उध्दारीले आहे‘‘ यशया ४४:२२ मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही‘‘ यिर्मया ३१:३४. “दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याजवर दया करील, तो आमच्या देवाकडे (परमेश्वर) वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील’ यशया ५५:७ त्या दिवसांत, त्याकाळी लोक इस्त्राएलाचे दुष्कर्म धुडितील पण त्यात ती सापडावयाची नाहीत, कारण ज्यास मी बचावून ठेवीन त्यास मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो‘‘ यिर्मया ५०:२०. COLMar 146.1

परमेश्वर उत्सुकतेने पश्चात्तापी पापी जनांचा स्विकार करीतो हे किती मोठे आश्वासन आहे ! वाचकहो, तुम्ही तुमचा स्वमार्ग स्विकारला आहे काय ? तुम्ही परमेश्वरापासून दूर बहकून गेला आहात काय ? तुम्ही आज्ञाभंगाची फळे यांची मेजवानी करण्याचा प्रयत्न केला पण ती खाताच त्यांची राख झाली असे दिसून आले काय ? आणि आता, तुमची सर्व साधने संपली आहेत, तुमच्या जीवनाच्या योजना खुंटून पडल्या आहेत, तुमच्या भावना मृत्त झाल्या आहेत, अशा स्थितीत तुम्ही एकांत व अस्थिर झाला आहा काय ? पण जी एक वाणी पुर्वीपासून तुम्हांशी बोलत होती. ती तुम्ही ऐकण्यास राजी नव्हता पण तिच वाणी आता स्पष्ट व खासपणे तुम्हांकडे येत आहे ; उठा, चालते व्हा, हे तुमचे विश्रांतीस्थान नव्हे; कारण अशुध्दतेने नाश, समुळ नाश, होईल‘‘ मीखा २: १० तुम्ही तुमच्या पित्याच्या घरी परत जा. तो तुम्हास म्हणतो अर्थात आमंत्रण देतो, “मजकडे फीर, कारण मी तुला उध्दारीले आहे’ यशया ४४:२२. COLMar 146.2

सैतान शत्रु हे सुचविल की, तुम्ही चांगले होईपर्यंत ख्रिस्तापासून दूर राहा व तुमचे शील चांगले होईपर्यंत तुम्ही परमेश्वराजवळ येऊ नका, या सुचनेकडे लक्ष देऊ नका, कारण जर तुम्ही चांगले होईपर्यंत थांबला तर तुम्ही कधीही येणार नाही. जेव्हा सैतान तुम्हास तुमच्या घाणेरडया चिंध्या दाखवितो तेव्हा येशच्या या अभिवचनाची पुनरावृत्ती करावी. “जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच’ योहान ६:३७, शत्रुला सांगणे येशूचे रक्त सर्व पापापासून शुध्द करीते. प्रार्थना ही तुमची प्रार्थना करा, “एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन ; मला धू म्हणजे बर्फाहून पांढरा होईन. स्तोत्र ५१:७. COLMar 146.3

“परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याजवर दया करील, तो आमच्या देवाकडे (परमेश्वर) वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील’ यशया ५५: ६, ७. COLMar 147.1

उठा व तुमच्या पित्याकडे जा. तो तुम्हास भेटावयास धावत येईल. तुम्ही पश्चात्तापी मनाने त्याजकडे एक पाऊल टाकाल तर परमेश्वर बाप प्रितीने तुम्हास मिठी घालील. जो पश्चात्तापी अंत:करणाने पित्याकडे हाक मारीतो ती हाक परमेश्वर ऐकतो. परमेश्वराकडे प्रथमतः वळणारा आत्मा हा परमेश्वरास समजतो. प्रार्थना कितीही अडखळीत शब्दांची असो; तुम्ही गुप्तपणे ढाळलेले अश्रू, परमेश्वरास भेटण्याची आतुरता अशा प्रत्येक प्रसंगी परमेश्वराचा पवित्र आत्मा तेथे भेटावयास सज्ज असतो. तुम्ही तुमची प्रार्थना म्हणण्यापुर्वी, तुमच्या अंत:करणावर जी कृपा कार्य करीते तिला दुजोरा देणेस ख्रिस्ताची कृपा धाव घेते. COLMar 147.2

तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या अंगावरील पापाने मळीन झालेली वस्त्र काढून घेईल. जखऱ्यारूपी दाखला केलेले भविष्य प्रमुख याजक यहोशवा प्रभुच्या दिव्यदूतापुढे उभा होता, तो पापी लोकांचा प्रतिनिधी असा होता. प्रभुने त्यावेळी सांगितले, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पाहा, मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे. मी तुला उंची पोशाख घालीत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला‘‘ जखऱ्या ३:४,५ परमेश्वर तुम्हांलाही त्याचप्रमाणे पोशाख घालील, “मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे‘‘ यशया ६१: १० “तुम्ही मेंढवाडयामध्ये पडून राहता काय ? ज्याचे पंख रूप्याने व पिसे पिवळया सोन्याने मंडीत आहेत अशा कबुतरासारखे तुम्ही आहां ना? स्तोत्र ६८:१३. COLMar 147.3

तो तुला त्याच्या मेजवानीस नेईल व त्याची प्रेमध्वजा तुजवर फडकाविल (गीतरत्न २:४) “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व संभाळीले तर तू माझ्या मंदिरात...येथे उभे असणाऱ्यात तुझे जाणे येणे होईल असे मी करीन‘‘ (जखऱ्या ३:७). COLMar 147.4

“नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल‘‘ यशया ६२:५. “परमेश्वर तुझा देव, सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे, तो तुजविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील. तुजविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल‘‘ सफन्या ३: १७ पित्याच्या या आनंदाच्या गीतात स्वर्ग व पृथ्वी ही भाग घेतील “कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन: जीवंत झाला आहे हरवला होता तो सापडला आहे‘‘. COLMar 147.5

तारणाऱ्या येशूने हा जो दाखला सांगितला यात आतापर्यंत सर्व काही चांगले होते, आनंदात कोणतीही भेसूर घटना नव्हती, पण ख्रिस्त आता आणखी एका घटकाची माहिती देतो. जेव्हा हा उधळया घरी आला तेव्हा “वडिल मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला तेव्हा त्याने वाद्ये व नृत्य ऐकले. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे ? त्याने त्याला सांगितले. आपला भाऊ आला आहे, आणि तो आपल्या वडीलांना सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पोसलेले वासरू कापिले आहे. तेव्हा तो रागावून आत जाईना,’ हा वडील भाऊ त्याच्या वडीलांची जी काळजी होती त्यात भागीदार व त्याचा भाऊ हरवला त्याला शोधणे यात भाग घेत नव्हता म्हणून पित्त्याने जो उधळया पुत्र परत आला म्हणून आनंदोत्सव केला त्यातही तो भाग घेऊ इच्छित नव्हता. ती आनंदाची गाणी त्याच्या कानी पडत होती. त्यामुळे त्याच्या मनात आनंद वाटत नव्हता. चाकराला त्याने विचारले की, ही मेजवानी कशासाठी चालली आहे आणि त्या उत्तराने त्याचा द्वेष जादा भडकला. त्याचा हरवलेला भाऊ परत आला त्याची विचारपूस करणे व तू कसा काय आहे यासाठी तो आत गेला नाही. त्या उधळया पुत्राला जी मेहरबानी दाखविली ती या वडील भावाला त्याचा अपमान अशी वाटली. तो त्याच्या बापाच्या घरी राहून विचार करीतो की त्याच्या सेवेबद्दल त्याला काही मोबदला मिळत नाही. आणि जेव्हा त्याचा बाप त्याची समजूत घालावयास आला तेव्हा त्याचा गर्व व खडतर वैर ही प्रकट झाली. वडील मुलगा त्याच्या पित्याच्या घरी राहन त्याच्या सेवेबद्दल काहीच परतफेड झाली नाही असे सांगतो व उलट उधळया पुत्र हा परत आला असता त्याच्यासाठी एवढी मोठी मेजवानी करून आनंद व्यक्त केला जातो. वडील मुलगा म्हणतो माझी सेवा चाकराप्रमाणे गणली गेली पुत्राप्रमाणे नाही. पित्याच्या गृही त्याला आनंद वाटण्या ऐवजी त्या परिस्थितीतून त्याला काय फायदा आहे का हे तो पाहात होता. त्याच्या शब्दावरून दिसून येते की यामुळे त्याने बापाचे सुख नाकारले असावे. अशा परिस्थितीत त्याचा भाऊ जर पित्याच्या देणगीचा भागीदार होऊ शकतो, तर मी वडील भावाने चुक केली असे समजावयाचे. उधळया पुत्राला जो सन्मान दाखविला त्याविषयी वडील भाऊ कूरकूर करीतो. तो म्हणतो मी जर माझ्या वडीलांच्या ठिकाणी असतो तर त्या उधळया पुत्राचा मी स्विकारच केला नसता. तो त्याला त्याचा भाऊ म्हणून हाक मारीत नाही तर काय म्हणतो’ ‘तुमचा मुलगा‘. COLMar 148.1

तरीपण पिता त्याची प्रेमळपणे समजूत घालतो व म्हणतो, “बाळा, तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे’ ही सर्व वर्षे तुझा भाऊ बहिष्कृत जीवन जगत होता; आणि तो आता आला आहे अशा समयी तू माझ्याबरोबर उत्सव व आनंद करू नये काय? COLMar 149.1

आपल्या लेकरांसाठी जे काही आनंदासाठी हवे ते त्यांना मोफत असे दिले जाते. त्या पुत्राने देणगी वा बक्षिस याबाबत प्रश्नच काढावयाचा नसता. “जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे‘‘ तू केवळ माझ्या प्रितीवर विश्वास ठेव व जी देणगी तुला दिली आहे ती मनमोकळेपणाने घे. COLMar 149.2

पित्याची प्रिती समजली नाही त्यामुळे एक पुत्र घरातून निघून गेला होता. पण आता तोच पुत्र परत आला त्यामुळे चिंता निघून गेली व जिकडे तिकडे आनंदोत्सव चालला होता. “कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जीवत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे‘‘. COLMar 149.3

वडील भावाची ही जी अनुपकारी वृत्ती ही दाखविली गेली काय ? जरी त्याच्या धाकटया भावाने दुवर्तन केले तरी तो त्याचा भाऊ आहे हे त्याला समजून आले का? वडिल भावाची ही कठोर प्रवृत्ती व द्वेषभावना याविषयी त्याला पश्चात्ताप झाला काय ? ख्रिस्त, याविषयी काही लिहीत नाही. हा दाखला अजून पुढे काय काय व्हावयाचे याबाबत जे ऐकणारे आहेत त्यांनी यावरील निष्कर्ष काढावयाचा आहे. COLMar 149.4

वडील भाऊ म्हणजे ख्रिस्त युगातील जे यहुदी ज्यानी पश्चात्ताप केला नाही व त्या काळातील व भावी काळातील परूशी जे, इतर लोकांकडे जकातदार व पापी या दृष्टीने पाहतात. कारण त्यांना वाटते की ते काय महान पापात गेले नाहीत तर ते स्वत:स स्वधार्मिक असे समजतात. ख्रिस्त अशा दोषरोप करणाऱ्या लोकांना भेटला. दाखल्यातील वडील पुत्राप्रमाणे त्यांना परमेश्वरापासून खास सवलतीची प्राप्ती झाली. ते परमेश्वराच्या गृहातील पुत्र आहेत असे सांगतात, पण त्यांची प्रवृत्ती जणु काय नोकराप्रमाणे आहे. ते काम करीत होते पण प्रितीने नसून तर आपणास वेतन मिळावे म्हणून त्यांच्या दृष्टीने परमेश्वर हा जुलमी मुकादम आहे. ख्रिस्त हा, जकातदार व पापी जणास मोकळेपणाने बोलावून त्याची कृपादाने देतो, हीच कृपा शास्त्री कष्टाने व श्रमाने मिळविणेचा प्रयत्न करीत होते... तरी त्यांचा अपमान झाला. अशा प्रकारे उधळया पुत्राचे येणे यामुळे पित्यास आनंद झाला, तर उलट या लोकांना द्वेष वाटू लागला. या दाखल्यात पिता वडील मुलांची समजूत घालतो हीच स्वर्गीय विनवणी परूशी लोकांना आहे, “जे माझे आहे ते सर्व तुझेच आहे‘‘ तुला हे वेतन पगार म्हणून नव्हे तर देणगी आहे. त्या उधळया पुत्राप्रमाणे तुलाही हे सर्व तुम्ही लायक नसताना तर पित्याची प्रिती म्हणून देणगी असे आहे. COLMar 149.5

या दाखल्यामध्ये बापाने आपल्या वडील मुलाची कान उघडणी केली ती परूशासाठी प्रेमाचा सल्ला होता. “माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.’ हे सर्व पगार म्हणून नसून ही देणगी आहे; आणि उधळया पुत्राप्रमाणे तुम्ही लायक नसता ही देणगी तुम्हालाही मिळू शकते. COLMar 150.1

स्वधार्मिकता यामुळे मनुष्य परमेश्वराचा अयोग्य प्रतिनिधी ठरतो त्याशिवाय त्याच्या सहबांधवाबरोबर त्याचे वागणे कठोर व टीका असे असते. वडील भाऊ त्याच्या त्या स्वधर्मिकतेत, स्वार्थीपणा, द्वेष यातून त्याच्या भावाच्या प्रत्येक कृत्तीचे निरीक्षण करून त्यावर टीका करणे व थोडी जरी चुक झाली तरी त्याला दोष देणे त्याच्या प्रत्येक चुकीकडे लक्ष दिले जाते व त्या प्रत्येक चुकीबाबत त्याला दोष दिला जातो. अशाप्रकारे तो त्याचा अक्षम्य स्वभाव बरोबर आहे असे कारण देतो व पटवितो. आजही लोक असेच वागत आहेत. एखादा आत्मा त्यावर येणारे मोहाचे पूर याविरूध्द प्रथम प्रयत्न करीत असता पुष्कळजण बाजुला उभे राहतात, उध्दट स्वार्थी वृत्ती, कागाळी करीत, दोष देत. हेच लोक स्वत:स परमेश्वराचे लोक म्हणत असतील पण त्याचे वागणे सैतानी वृत्तीचे आहे. त्यांच्या भावाविषयी त्यांची ही प्रवृत्ती यामुळे ते लोक स्वतः अशा परिस्थितीत उभे राहात की परमेश्वर त्यांच्यावर त्याचा तेजोमय प्रकाश पाडू शकत नाही. COLMar 150.2

पुष्कळजण सतत असे विचारतात, “मी काय घेवून परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे, घेवून त्याजपुढे येऊ काय ? हजारे एडके तेलाच्या दशसहस्त्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय ? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नितीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो? मीखा ६:६ -८. COLMar 150.3

अशाच सेवेची परमेश्वराने निवड केली आहे — “दुष्टतेच्या बेडया तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे... तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये’ यशया ५८, ६,७ जेव्हा तुम्हांस समजून येईल की तुम्ही पापी आणि केवळ पित्याच्या प्रितीमुळे तुमचे तारण झाले आहे तेव्हा तुम्हासारीखा पापी मनुष्य पापात दु:ख सोशितो त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रेमळ सहानुभूती येईल. अशी भावना असली जे कोणी पश्चात्ताप करीतात, त्रासापासून मुक्त होतात त्याच्याविषयी तुमच्या मनात केव्हाही द्वेष व निंदा या भावना येणार नाहीत. जेव्हा तुमच्या मनातील स्वार्थरूपी बर्फ वितळून जाईल तेव्हा तुम्ही परमेश्वराशी सहमत होऊन सहानुभूती दाखवाल व तो आत्मा जिंकणे या सहभागीपणाच्या आनंदाचे वाटेकरी व्हाल. COLMar 150.4

तुम्ही परमेश्वराचे पुत्र असे म्हणता हे खरे आहे, पण हे ही खरे आहे की, तुझा भाऊ’ हा मेला होता. तो जीवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे”त्याचा तुझा आतापासून घनिष्ट नातेसंबंध आहे; कारण परमेश्वर त्याला त्याचा पुत्र म्हणून स्विकारीतो. तुझा त्याचा भाऊ म्हणून जर संबंध नाही असे म्हणशील तर तू केवळ या घराचा चाकर आहेस आणि परमेश्वराच्या कुटुंबातील पुत्र असा नाहीस. COLMar 151.1

या तुझ्या भावाच्या स्वागतार्थ जी मेजवानी वा आनंदोत्सव केला त्यात तुम्ही भाग घेतला नाही तर हा कार्यक्रम आनंदाने पार पडेल, जो मुलगा परत आला त्याला त्याच्या पित्याच्या घरी राहावयास जागा मिळेल व तो पित्त्याचे काम करील. ज्याला जास्त क्षमा केली तोच जास्त प्रिती करील. पण तुम्ही प्रितीविना असेच अंधारात राहाल. कारण “जो प्रिती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही’ १ योहान ४:८. COLMar 151.2